रत्नागिरी : रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयात दिव्यांची अमावास्या अनेक वर्षांपासून अनेक प्रकारचे दीप प्रज्ज्वलित करून साजरी केली जाते. सण, संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख होण्यासोबतच विविध प्रकाशस्रोतांची माहिती त्यांना व्हावी, हा त्यामागचा हेतू असल्याचे मुख्याध्यापक विनोद नारकर सांगतात. यंदाची दीप अमावास्या उद्या (११ ऑगस्ट) साजरी केली जाणार आहे.
आपल्या संस्कृतीची, परंपरांची, सणांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी या हेतूने अभ्यंकर विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शाळेत अनेक वर्षांपासून दीपपूजनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला जात आहे. संस्कृतीचा वारसा जतन करणे हा निर्मळ हेतू आहेच. त्याचबरोबर विविध प्रकाशस्रोतांचा मुलांना परिचय व्हावा, त्यांचे महत्त्व व उपयोग जाणून घेता यावेत, याकरिता पारंपरिक दगडी दिव्यांपासून ते अगदी सौरऊर्जेवर चालणाऱ्या विविध दिव्यांची आरास या दिवशी आकर्षकरीत्या विद्यालयात मांडली जाते.
भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योत, वात, फुलवात यांना महत्त्वाचे स्थान आहे. दिवा आणि प्रकाशाचे जीवनाशी असलेले नाते अतूट आहे. दिव्यामुळे जीवनात प्रकाश निर्माण होतो. या संकल्पनेनुसार अंतरिक्ष, अवकाशीय ज्ञानामध्ये ज्यांनी प्रकाश प्रज्ज्वलित केला ते भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याची ओळख या दीपपूजनाच्या माध्यमाद्वारे करून देण्याचा अनोखा प्रयत्न अभ्यंकर विद्यालय करत आहे. एक पणती ज्याप्रमाणे अंधार नष्ट करून सर्वत्र प्रकाश पसरवते, त्याचप्रमाणे डॉ. कलाम यांचे प्रेरणादायी विचार पणतीप्रमाणे कार्य करतील. त्यातूनच विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानरूपी प्रकाश निर्माण होईल, असा विश्वास मुख्याध्यापक नारकर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाविषयी :
दिवस : ११ ऑगस्ट २०१८
स्थळ : परशुरामपंत अभ्यंकर विद्यालय, संजीवन चिकित्सा मंदिरसमोर, रत्नागिरी
वेळ : सकाळी ११.३० वाजता
पालकांसाठी वेळ : दुपारी दोन वाजल्यानंतर
(यंदा दोन दिवस अमावास्या असल्याने दीपपूजन नेमके केव्हा करावे, हे जाणून घेण्यासाठी , तसेच दिव्यांच्या अमावास्येबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)